PM Kisan Sanman Nidhi Instalment: देशातील कोट्यवधी शेतकरीपंतप्रधान किसान सन्मान निधीच्या १९ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता यासंबंधीची एक मोठी अपडेट समोर आलीये. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता जारी करतील. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी, यावेळी पंतप्रधान मोदी शेतीशी संबंधित इतर अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील आणि राज्याच्या विकासाशी संबंधित अनेक योजनांचा शुभारंभ करतील, अशी माहितीही दिली.
दरवर्षी ६ हजार रुपये
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN Portal) योजना ही केंद्र सरकारद्वारे चालविली जाणारी योजना आहे, ज्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते. शेवटचा म्हणजेच १८ वा हप्ता पंतप्रधान मोदी यांनी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केला होता.
ई-केवायसी का महत्वाचं?
योजनेचा लाभ योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि फसवणूक होऊ नये, यासाठी सरकारने ई-केवायसी बंधनकारक केलंय. आधारशी जोडलेल्या बँक खात्यात पैसे पोहोचत असल्याने ही प्रक्रिया आवश्यक आहे. PM Kisan
ई-केवायसी कसं करावं?
सरकारने शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी तीन मार्ग आहेत:
१. ओटीपी आधारित ई-केवायसी: ही प्रक्रिया पीएम किसान पोर्टल आणि मोबाइल अॅपवर उपलब्ध आहे.
२. बायोमेट्रिक ई-केवायसी : ही सेवा कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) आणि राज्य सेवा केंद्रं (एसएसके) येथे उपलब्ध आहे.
३. फेस ऑथेंटिकेशन ई-केवायसी: ही सुविधा पीएम किसान मोबाइल अॅपद्वारे केली जाऊ शकते.
अन्यथा अडकू शकतो हप्ता
जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केलं नसेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा, अन्यथा तुमचा १९ वा हप्ता अडकू शकतो. ई-केवायसीशिवाय कोणताही शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही, असं सरकारनं स्पष्ट केलंय. PM Kisan